गणेशोत्सव आणि राष्ट्रभक्ती - पुन्हा सुरु होऊ शकते?

विचारयज्ञ परिवारातील सर्व वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान गणपती आपल्या आध्यात्मिक प्रगतीतील विघ्ने दूर करून आपल्याला सर्वांना परमशांतीच्या पथावर अग्रेसर ठेवो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना!


हे गणेशा! भारताच्या सीमेवर सध्या तणाव सुरु आहे. हे परमेश्वरा!  डोळ्यांत तेल  घालून अखंड सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या योद्ध्यांवर तू कृपा कर.

आमच्यासारखे सामान्य जन, देशभक्तीपासून दूर जात आहोत, आमच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत कर! __/\__


प्रतिमा: भगवान गणपती





गणेशोत्सवाचे मूळ देशभक्तीचे प्रयोजन आता लुप्तप्राय झालेलेच आहे. असे असले तरी, राष्ट्रासमोरील समस्या पाहता मुख्यत: सीमेवरील गोळीबार आणि जागतिक आतंकवाद, हे पाहता आपण एकतेसाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. खूप मोठमोठे कार्यक्रम करणे शक्य नाही झाले तरी, गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण कमीत कमी सीमेवर काय चालले आहे, या विषयावर लहान मोठी चर्चासत्र करूच शकतो. याशिवाय, पक्ष राजकारण - ज्यात आपल्याला न आवडणाऱ्या पक्षाला अपशब्द आणि आवडणाऱ्या पक्षाच्या सगळ्या चुकांची ही स्तुती या पलीकडे जाऊन - फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करूयात. कारण त्यानेच सद्य स्थिती जाणून घेता येईल आणि सार्थक चर्चा पण होईल. 

गणेशोत्सवादरम्यान आपण सगळीकडे सुख, शांती व समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करतो. पण प्रार्थनेबरोबरच आपले प्रयत्नही आवश्यक आहेत. आपण आपला देश सुरक्षित केला तर विकास आणि समृद्धी ही उद्दिष्टे कठीण नाहीत. सुरक्षेला अंतर्गत आणि सीमेवरही आव्हान आहे. विकास आणि संपन्नता खूपच आवश्यक आहे, पण ती टिकायलाही हवीत आणि त्यासाठी प्राथमिकता सुरक्षेला हवी. 

भारतासारख्या प्रचंड सामर्थ्यशाली राष्ट्राला विश्वशांतीसाठी मोठे योगदान देणे आताच्या परिस्थितीत आवश्यक आहे, पण ते तेव्हाच होईल, जेव्हा आपण जगाला संदेश देऊ की एकाही सैनिकाचा बळी गेलेला खपवून घेतला जाणार नाही. शांतीचर्चा आवश्यक आहेतच, उलट आपल्या सैन्याला बळी जाऊ न देता, मनुष्यहानी टाळून शत्रुराष्ट्रावर दबाव आणण्याचे आणि त्याच्या कारवाया थांबविण्याचे कसब डिप्लोमसी मध्ये पणाला लागते. ते पणाला लावले पाहिजे. आणि नाही वाटाघाटी सफल झाल्या तर त्याचे परिणाम शस्त्रसंधी भंग करणाऱ्या आक्रमक शत्रूस भोगावे लागतील असा दुहेरी दबाव निर्माण करता आला पाहिजे. 

सुरक्षेच्या मुद्द्यावर राष्ट्रव्यापी सार्वजनीक चर्चा करण्यास गणेशोत्सवासारखे दुसरे कुठले पर्व असेल!