स्वातंत्र्यदिन साजरा करताना भारताच्या सुरक्षेसमोरील ३ आव्हाने

सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताच्या अंतर्गत आणि सीमासुरक्षेसंबंधी काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. राष्ट्राला केंद्रीभूत ठेऊन ही चर्चा करणे आवश्यक आहे.

जे जे जिथे जिथे चुकले ते सगळे सुधारणे आवश्यक आहे.


आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवण्याने निष्पन्न काहीच निघणार नाही.

१. आज आपण स्वातंत्र्यदिन सुरक्षितपणे साजरा करतोय ते आपल्या सैन्यामुळे! 

स्वातंत्र्यापूर्वी अखंड भारतासाठी क्रांतिवीरांनी - स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान केले आणि खंडित भारताच्या स्वातंत्र्यानंतर आजही सैनिकांना बलिदान द्यावे लागत आहे. जगातील कुठल्याही राष्ट्रात सैन्य व नागरिक यांचे मृत्यू सहन केले जात नाही आणि मुळात अशी वेळ येऊ नये म्हणून सुरक्षा नीती ठाम आणि निश्चित असतात. भारत याला अपवाद आहे. म्हटले तर कधी रागावल्यासारखे करायचे, कधी शांती प्रक्रिया सुरु करायची किंवा कधी चक्क दुर्लक्ष करायचे. जवळजवळ रोजच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या बातम्या येत असतात. पण किती सैनिक हुतात्मे झाले याचा अधिकृत आकडा मिळणे कठीण आहे. अर्थातच परिस्थिती आपण जितकी समजतोय त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गंभीर आहे.  

२. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर एकाही सैनिकाचा बळी गेलेला सहन होणार नाही ही जनतेची मानसिकता असली पाहिजे. 

जनता आणि राजकारणी जवळपास सारख्याच दुर्लक्ष करण्याच्या स्थितीत दिसतात. इतर राष्ट्रांत आतंकवादी हल्ला असो वा शस्त्रसंधी भंग - अशा घटनांची आन्तरराष्ट्रीय बातमी होते, पण भारतात भारतातले नागरिक पण शस्त्रसंधीभंगाची बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत.  

३.जागतिक आतंकवादामुळे निर्माण झालेली नवीन आव्हाने: 

आतंकवादासाठी भारत नेहमीच सोफ्ट टार्गेट ठरला आहे. सध्या सगळे जगच भयंकर आंतकवादाने वेधले जात आहे. हे लोण भारतात येणे कितीसे कठीण आहे. काश्मीरच्या परिस्थितीत सुधारणेचे काही लक्षण नाही. बाह्य दहशतवाद, शेजारून वाढत चाललेली आक्रमकता आणि नक्षलवाद आणि दंग्यांनी पोखरत असलेला भारत भविष्यकालीन सुरक्षेसंबंधी आव्हानांना तोंड द्यायला किती सक्षम आहे? चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्यापैकी बहुतेक राष्ट्रभक्त बंधू इस्राईलला आदर्श मानतात. पण आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतोय की इस्राईलकडे असणारी एक भावना आपल्यात दिसत नाही. 'आपण आपल्यावरचे हल्ले रोखले नाहीत तर आपले अस्तित्व संपेल. आपला ज्यूंचा देश संपेल त्यामुळे आपण लढायलाच हवे, प्रत्येकाने!'
आणि लढणे म्हणजे सैन्य! प्रत्येक नागरिकाने सैन्यात काम करण्याचा अनुभव घ्यावा. ही नीती.

आपण कुठे कमी पडतोय यावर गंभीर मंथन होणे आवश्यक आहे. 
त्यासाठी मुळात आपण सर्वांनीच आता गंभीर होणे आवश्यक आहे.