विचारयज्ञाची पाच वर्ष

विचारयज्ञाच्या सर्व मित्रमैत्रिणींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या आयुष्यात  सुख, समृद्धि व प्रेमाचा प्रकाश घेऊन येणारी ठरो.


पाच वर्षांपूर्वी एक दिवा लावला होता, विचारयज्ञ हा मराठी ब्लॉग. तुम्हाला आठवतच असेल, दिवाळीच्या या प्रसन्न दिनीच आपल्या विचारयज्ञाची सुरुवात झाली, आजपासून  पाच वर्षांपूवी. आज विचारयज्ञ, लेखन हेच माझ आयुष्य झालंय. विचारयज्ञामुळे मला तुम्हा सर्वांना भेटता आलं. आपल्याला विचारांची देवाण-घेवाण करता आली. आपण फेसबुक वर, ब्लॉग वर खूप चर्चा पण केल्यात. या मंथनातून  आपल्याला काहीतरी आनंद, नवीन विचार, स्फूर्ती मिळत गेली. लेखन म्हणजे माझ्यासाठी  अव्याहत शिकणंच आहे. मला गेल्या पाच वर्षांत खूप शिकायला मिळालं. पुस्तक प्रकाशित करण्यापेक्षा सुद्धा माझं अनुदिनी वर जास्त प्रेम आहे, कारण मी लिहीलं की लगेच मला माझे विचार तुमच्यासमोर मांडता येतात, कविता शेयर करता येतात. हा आनंद खूप मोठा असतो. कविता ब्लॉगवर प्रसिद्ध केल्या केल्या फेसबुक, ट्विटर च्या माध्यमातून लगेच दुवा तुमच्याशी शेयर करण्यात जो आनंद आहे तो मला शब्दांत सांगता येणार नाही. पण तुम्हालाही तो आनंद नक्कीच जाणवत असेल. ब्लॉगिंगमुळे आपलं हे जे नात तयार झालं आहे, ते मला खूप प्रेरणा देतं. नवनवीन कल्पना, विचार, चर्चा लिहिण्यासाठी स्फूर्ती देतं. काही चुकलं तर सुधारण्याचीसुद्धा प्रेरणा देतं. तुमचा विश्वास म्हणजे माझी खूप मोठी शक्ति आहे. तुमची साथ माझ्यासाठी अनमोल आहे. लेखक त्याच्या लिहिण्याच्या वेडामुळे आणि वाचकांच्या प्रेमामुळे लेखक असतो. विषय आणि लेखनाचा प्रकार कुठलाही असो, पण तुमचं माझ्याबरोबर असणं माझ्यासाठी परमेश्वराची खूप मोठी कृपाच आहे. आज विचारयज्ञ च्या फेसबुक पानाला ८८५ पसंती आहेत. मी सोशल मीडिया वर खूप  प्रचार करीत नाही, नवीन पोस्ट लिहिल्या लिहिल्या शेयर मात्र करते. त्या तुलनेत तुमचा सगळ्यांचा विचारयज्ञात सहभाग आणि पसंती मला खूप खूप उत्साह देणाऱ्या आहेत.

आज मला असं वाटतंय की मी प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष भेटावं, दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या, तुमच्यामुळे मला कशी प्रेरणा मिळाली ते अगदी मनापासून भरभरून सांगावं...अगदी प्रत्येकाला. धुळ्यासारख्या छोट्याशा शहरातून मी हे छोटे छोटे प्रयत्न करतेय, पण तुम्हा सगळ्यांमुळे मला एक नवीन विश्व मिळालं - विचारांचं विश्व, प्रेमाचं, प्रेरणेचंआणि अगदी कौतुकाचं विश्व मिळालं.

तुमचे आभार मानावेत अशी केवळ औपचारिकता मला करताच येणार नाही. असेच स्नेह असू द्या. आपला विचारयज्ञ आपण दिवसेंदिवस वृद्धिंगत करू या.

विचारयज्ञात असेच भेटत रहा ....